Advertisement

अपघात स्थळांचा शोध घेऊन तिथं ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी- मुख्यमंत्री

राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणं लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी.

अपघात स्थळांचा शोध घेऊन तिथं ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी- मुख्यमंत्री
SHARES

राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणं लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, वाहतूक नियमांचं पालन सर्वांनी करावं, असं आवाहन ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ३२व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

'संयम' आणि 'नियम' पाळले नाही तर यम येतो

'नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी. रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडं लक्ष द्यावं. देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचं नियम स्वयंस्फूर्तीनं पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

नवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत त्या दृष्टीनं माहिती देणं आणि जनजागृती करणं महत्वाचं आहे. वाहन चालविण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचं पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करावं. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचं शिक्षण द्यावं.

अपघात कमी करण्यासाठी  प्रयत्न - अनिल परब

'सडक सुरक्षा- जीवन रक्षा' हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नातून, नियमांचं पालन करत आणि परस्परांच्या सहकार्यानं नियंत्रण मिळवू शकलो. तसेच प्रयत्न अपघात कमी करण्यासाठी देखील केले पाहिजेत. यावर्षी जवळपास २४ हजाराच्या आसपास अपघात झाले असून, आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के कमी आली आहे.

मृत्यूमध्ये १० टक्के कमी आली आहे. असं असलं तरी अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणं आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं.

नियमांचं काटेकोरपणे पालन करावं - अस्लम शेख

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणं अत्यावश्यक आहे. वाहन चालन परवाने कामात विविध विभागांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं.

या  उद्घाटनावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा,  परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय  परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा