शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं रत्ना नावाचं मालवाहून जहाज मंगळवारी अरबी समुद्रात बुडालं. सुदैवाने या जहाजावरील ओएनजीसी कंपनीसाठी काम करणाऱ्या सर्व १६ खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास या जहाजाच्या इंजिन रूममध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्याची पाहणी केली असता इंजिन रुममध्ये भगदाड पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे जहाज तात्काळी रिकामं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळेस 'एससीआय रत्ना'च्या जवळून प्राची नावाचं जहाज जात होतं. रत्ना जहाज बुडत असल्याचं त्यांनी पाहिल्यावर ते त्वरीत जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी पुढे आलं. त्यानुसार प्राची जहाजाच्या मदतीने सगळ्या १६ खलाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती एससीआय रत्नाचे कॅप्टन अनूप शर्मा यांनी दिली. रात्री ८ वाजता हे जहाज पूर्णपणे बुडालं.
मुंबईपासून १०० सागरी मैल अंतरावर बुडालेंल एससीआय रत्ना हे जहाज केवळ ५ वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जात आहे. हे जहाज बॉम्बे हाय जवळ तेलसाठ्यांचा शोध घेण्याचं काम करत असे. या प्रकरणाच्या चौकाशीचे आदेश शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियानं दिले आहेत.