मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचं काम पुर्ण झालं असून, रेल्वे वाहतूक पुर्ववत झाली आहे. गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी सकाळपासून मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकमुळं या मार्गावरून एकही लोकल न धावल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती.
ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचं काम काही वेळापूर्वीच पूर्ण झालं असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. नियोजित वेळेपूर्वीच हे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळते. मेगाब्लॉकमुळं डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर काही प्रवाशांनी स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता. तर दुसरीकडं मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्यानंही प्रवासी संतप्त झाले होते.
Traffic block between #Dombivali and #Kalyan for launching of FOB girders at #Thakurli completed in time. Slow & Fast line Services are being normalised. pic.twitter.com/ThvvIr5zkE
— Central Railway (@Central_Railway) December 25, 2019
काम पूर्ण झाल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेनं रवाना झाली. तर गोरखपूर एक्स्प्रेस डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेनं रवाना झाली. मध्य रेल्वेनं दर १५ मिनिटांनी डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं ट्रेन सोडण्याचं नियोजन केलं होतं. तसंच, मधल्या काळात काही रिकाम्या लोकल सोडण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला.
हेही वाचा -
IRCTCकडून नाष्टा, जेवणाच्या दरांत बदल
रेल्वे प्रवाशांसाठी आता एकच हेल्पलाइन ‘१३९’