मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची मंगळवारी चाचणी घेण्यास सुरुवात केली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले.
या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते.
मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.५३ वाजता निघाली आणि प्रभावी वेळेत अंतर कापून दुपारी १२.५० वाजता गोव्यात पोहोचली.
सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव चालवण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.
मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर यांना जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशानंतर, मध्य रेल्वे मार्गावर मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर दोन अतिरिक्त गाडय़ा सुरू करण्यात आल्या. या गाडय़ांनी त्यांचा वेग, आराम आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी याआधीच सर्वत्र प्रशंसा मिळवली आहे.