उन्हाळ्यात प्रवाशांच्या घशाला कोरड पडू नये यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. रेल्वे स्थानकांतील बंद झालेल्या पाणपोई, पानाच्या पिचकाऱ्यांचे चढलेले रंग यामुळे रेल्वे प्रवासी रेल्वेच्या स्टॉलवरून बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पण आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर हायटेक वॉटर वेंडिंग मशिन बसवले आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) कडून ही सेवा सुरू करण्यात आली असून, येत्या काळात आणखी 45 मशिन्स नव्याने रेल्वे स्थानकांमध्ये बसविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकात पहिली हायटेक वॉटर वेंडिंग मशिन बसविल्यानंतर टप्याटप्याने इतर स्थानकांमध्ये देखील या मशिन बसविण्यात येत आहेत. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांमध्ये सुमारे 80 मशिन्स सुरू करण्यात आल्या आहेत. तर येत्या काळात आणखी 45 मशिन्स बसवण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने दिली. यामधील काही मशिन 'जनजल' तर काही मशिन 'क्वॉन्टोस' या कंपनीच्या आहेत. ज्या स्थानकार मशीन लावण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून त्याचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे.
प्रवाशी पाण्याविना राहू नये यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थानकांवर थंडगार आणि स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपविली होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील विविध स्थानकांवर मागील वर्षातच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना मशिनमध्ये पैसे टाकल्यानंतर पाणी उपलब्ध होणार असून, प्रवाशांच्या बाटलीत पाच रुपयांत एक लिटर पाणी भरून मिळणार आहे. तर प्रवाशाकडे बाटली नसल्यास त्याला नव्या बाटलीतही एक लिटर पाणी उपलब्ध होणार असून, त्यासाठी त्याला आठ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक ग्लास पाण्याची गरज असणाऱ्या प्रवाशांनाही केवळ दोन रुपयांत पाणी उपलब्ध होणार आहे.
मिली | बाटली असल्यास | बाटली नसल्यास |
300 | 1 | 2 |
500 | 3 | 5 |
1 लिटर | 5 | 8 |
2 लीटर | 8 | 12 |
5 लीटर | 20 | 25 |