वांद्रे - एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी शिविगाळ करून धमकी दिल्याचा आरोप वांद्रे पश्चिम येथील नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात पठाण यांच्याविरोधात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
वांद्रे पश्चिम येथील कब्रस्थानाच्या एका जमिनीवरून नौपाड गोळीबार कोकणी ट्रस्ट आणि तेथे 100 वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांमध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणी 2011पासून खटलाही सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही गटांना भेटण्यासाठी आमदार पठाण सोमवारी वांद्र्यात आले होते. या वेळी त्यांनी रहिवाशांना शिविगाळ करून धमकावलं, त्यानंतर आसिफ पीर मोहम्मद खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
याबाबत विचारलं असता "आपण केवळ तेथील रहिवाशांना भेटायला गेलो होतो", असं पठाण यांनी सांगितलं. मात्र वारिस पठाण यांनी पालिकेला पाठवलेल्या माझ्या एका पत्राने इथली घरं तुटतील, अशी धमकी दिल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.