९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्यावरून सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी साहित्य संमलेनाध्यक्ष अरूणा ढेरे यांना खुलं पत्र लिहलं आहे. या पत्रात साहित्य संमलेनाध्यक्ष अरूणा ढेरे यांनी या संमेलनावर बहिष्कार टाकावा, असं आवाहन मुणगेकरांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणावरून वाद सुरू असून या वादावर विविध स्तरातून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वर्षी तुमची बिनविरोध निवड झाली. मराठी भाषिकांसाठी ही नक्कीच सुखावणारी गोष्ट आहे. परंतु यावेळी साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यिका नयनतार सहगल यांना उद्धाटक म्हणून दिलेलं निमंत्रण संयोजकांनी रद्द केलं आणि भानगडींची परंपरा सुरू ठेवली. सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे.
सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू हे कारण सांगून काही झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळं त्यांच निमंत्रण रद्द करण्यात आलं. खरे कारण, सहगल या एक संवेदनशील साहित्यिका असल्यानं त्या देशातील प्रचलित वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करणार होत्या, असं अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटलं आहे.
आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची, तो ही बिनविरोध सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरून अध्यक्षीय भाषण करणं हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माझ्या सारख्याला या औपचारिकपणाचं महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळं प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजकांप्रमाणे आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखं होईल. भारतातील उदारमतवादाचं जनक असलेल्या युगपुरूष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल. आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे, असंही त्यांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे.
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा यवतमाळमध्ये पार पडणार आहे. या साहित्य संमेलनासाठी उद्धाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध दर्शवला होता.
आपल्या राज्यात तसंच देशात मराठी साहित्यिक असून त्यांच साहित्य देशभरात वाचलं जातं. असं असताना मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजी साहित्यिकांना का बोलवलं जातं? असा प्रश्न मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. यानंतर आयोजकांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनला येऊ नका, असं एका पत्राद्वारं सहगल यांना कळवलं होतं.
हेही वाचा -