निर्माते भूषण कुमार भारतीय नौदलावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ४ डिसेंबर १९७१ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान भारतीय नौदलानं पाकिस्तानमधील महत्त्वाचं बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता. याच घटनेवर आधारित ‘नेव्ही डे’ या चित्रपटाची ते निर्मिती करत आहेत. सुरेश त्रिवेणी, तनुज गर्ग, अतुल कसबेकर आणि स्वाती अय्यर चावला यांच्यासोबत मिळून ते चित्रपट निर्मिती करणार आहेत.
भारतीय नौदलानं एका रात्रीत पाकिस्तानची तीन जहाजं उदध्वस्त केली. तसेच क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला. कराची बंदराची धुळधाण उडवल्यानंतर भारतीय नौदलानं अजून एक पराक्रम गाजवला. पाकिस्तानी नौदलाकडे असलेली तेव्हाच्या काळातील बलाढ्य पाणबुडी पीएनएस गाझी नौदलानं बुडवली. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाचं सामर्थ्य अधिकच खच्ची झालं. आता हा सगळा थरार तुम्हाला 'नेव्ही डे' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात कुठल्या कलाकाराची वर्णी लागणार हे अजून निश्चित नाही. कलाकारांची निवड झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. रजनिश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून २०२१ च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा -