मुंबई - 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं अखेर पाकिस्तानी कलाकारांबाबतचं मौन सोडलंय. यापुढे माझ्या सिनेमात पाकिस्तानी कलाकार नसेल, असं त्याने स्पष्ट केलंय. मनसेनं ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला कडाडून केलेल्या विरोधानंतर त्याने एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'काही दिवसांपासून मी गप्प का आहे, असं विचारलं जात होतं. मात्र मला हेच सांगायचंय की, देशापेक्षा मोठं काहीही नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान ऐ दिल है मुश्किल सिनेमाचं शूटिंग झालं. त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेसाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. शांततेसाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. मला देशभावनेचा आदर होता आणि कायम राहील. मी दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा निषेध करतो. मला जवानांचा आदर आहे. माझ्यासाठी माझा देश हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र सिनेमावर बंदी घालणं, हा माझ्या सर्व क्रू मेंबरवरही अन्याय आहे, असंही करणनं म्हटलंय.
मला राष्ट्रद्रोही म्हटलं गेलं. त्याचं खूप दु:ख झालं, असंही करणनं नमूद केलं. माझ्यासाठी माझा देश हे सर्वस्व आहे आणि यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला माझ्या सिनेमात स्थान नसेल, असंही करणने स्पष्ट केलंय.