यंदा ईदचा मुहूर्त साधत सलमान खानचा 'भारत' प्रदर्शित झाला आहे. 'भारत'ला पहिल्याच दिवशी मिळालेल्या विक्रमी यशानंतर सलमाननं पुढल्या वर्षीची ईदही आपल्या नावे केली आहे.
तसं पाहिलं तर सलमान सध्या बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी महत्त्वाचा असलेला 'भारत' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं यापूर्वी ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या सर्व चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या व्यवसायाचा विक्रम मोडीत काढला आहे. याशिवाय यंदा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी धडाकेबाज कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही 'भारत'नं अव्वल स्थान पटकावलं आहे. अशातच संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनाखाली बनणारा सलमानचा 'इंशाअल्लाह' हा चित्रपट पुढल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची बातमी आली आहे.
'इंशाअल्लाह'च्या निमित्तानं भन्साळी आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत. १९ वर्षांपूर्वी सलमाननं भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' या सुपरहिट चित्रपटात सलमाननं नायक साकारला होता. आता एका मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा दोघे एकत्र आल्यानं या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. अशातच या चित्रपटात सलमानच्या जोडीला आलिया भट्ट दिसणार असल्यानं या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचे वेध सिनेप्रेमींना लागले आहेत. सलमान-आलिया या काहीशा अनमॅच जोडीची केमिस्ट्री या चित्रपटात कशी जुळेल याचं कुतूहलही सलमानच्या चाहत्यांना आहे.
खरं तर पुढल्या वर्षी ईदला दोन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यामुळं बॅाक्स आॅफिसवर पुन्हा एकदा चढाओढीचं चित्र पहायला मिळणार होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार अभिनीत 'सूर्यवंशी' हा बहुचर्चित चित्रपटही पुढल्या वर्षी ईदलाच प्रदर्शित होणार होता, पण बॅाक्स आॅफिसवरील क्लॅश टाळण्यासाठी रोहितनं दोन पावलं मागे घेत थांबणं पसंत केलं. त्यामुळं सलमानच्या 'इंशाअल्लाह'चा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन चित्रपटांमधील क्लॅश टळल्यानं सलमान-अक्षयच्या चाहत्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.
हेही वाचा -
कंगनासोबत स्मिता कोणाशी घेणार ‘पंगा’?
'भारत'ने मोडला ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्याच चित्रपटांचे विक्रम