मुंबईतील जुन्या उद्योगांपैकी एक असलेल्या गोदरेज समूहाच्या मालमत्तेची लवकरच वाटणी होण्याची शक्यता आहे. गोदरेज समूहाच्या मालकीच्या जमिनीवरून कुटुंबात कलह सुरू झाला आहे. या वाटणीसाठी गोदरेज कुटुंबीयांनी आघाडीच्या कायदेविषयक कंपन्यांकडे धाव घेतल्याचं समजत आहे.
गोदरेज कुटुंबात चेअरमन आदि गोदरेज, त्यांचा भाऊ नादिर आणि चुलत भाऊ रिशद, जमशीद, स्मिता गोदरेज यांचा समावेश आहे. आदि यांना तान्या, निसाबा आणि पिरोजशा अशी तीन मुलं आहेत. नादिर यांनाही तीन मुलं आहेत. जमशीद यांना रायका आणि नवरोझ अशी दोन मुले, तर स्मिता यांना फ्रेयान आणि निरिका अशी दोन मुलं आहेत.
लाखो रुपयांचा उद्योग समूह असणाऱ्या गोदरेज कुटुंबियांच्या ताब्यात मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जमीन देखील आहे. एका अर्थाने त्यांना मुंबईचा लँडलाॅर्डही म्हणता येईल. विक्रोळीत त्यांच्याकडे एकूण ३४०० एकर जमीन असून यापैकी १००० एकर जमीन विकसित करण्याजाेगी आहे. या जमिनीची बाजारातील किंमत २० हजार कोटी रुपये आहे. ही जमीन कशी विकसित करायची यावरून गोदरेज बंधूंमध्ये मतभेद आहेत.
या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांधकामं होऊ नये, असं जमशीद गोदरेज यांचं म्हणणं आहे. तर आदि आणि नादिर गोदरेज कुटुंबियांची इच्छा या जमिनीवर बांधकामं व्हावीत, अशी आहे.
या मतभेदांमुळेच जमिनीच्या वाटणीसाठी गोदरेज अॅण्ड बॉयसचे चेअरमन जमशीद गोदरेज निमेश कम्पानी आणि एजेबी पार्टनर्सचे वकील जिया मोदी यांचा सल्ला घेत आहेत. तर त्यांचे चुलत भाऊ आणि गोदरेज समूहाचे चेअरमन आदि गोदरेज आणि गोदरेज अॅग्रोव्हॅटचे चेअरमन नादिर गोदरेज बँकर उदय कोटक तसंच सिरिल अमरचंद मंगलद यांच्याशी संबंधित सिरिल श्रॉफ यांचा सल्ला घेत आहेत.
गोदरेज समूह १२२ वर्षे जुना आहे. १८९७ मध्ये तरुण पारशी वकील आर्देशीर गोदरेज यांनी एका कुलुपाच्या कंपनी सुरू करून गोदरेज समूहाची मुहूर्तमेढ रोवली होती. गोदरेज समूहात गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्यूमर, गोदरेज अॅग्रोव्हेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि एस्टेक लाइफसायंसेस या ५ कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-
अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं कंत्राट
RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा