मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार पुढील महिन्यापासून एक नवीन तंत्रज्ञान आणणार आहे. जर मोबाइलमधून सिम कार्ड काढले किंवा आयएमईआय नंबर बदलला तरी नवीन तंत्रज्ञानाने मोबाइलचा शोध घेता येणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर डेटा आणि सेवा बंद होणार आहे. त्यामुळे ज्याने कुणी मोबाइल चोरला असेल त्याला तो मोबाइल वापरता येणार नाही.
दूरसंचार विभागाने सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलीमेटिक्सच्या सहकार्याने एक नवीन तंत्रज्ञान तयार केलं आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे या तंत्रज्ञानाचा अनावरण सध्या होऊ शकलं नाही. २६ जुलैला अधिवेशन संपल्यानंतर या तंत्रज्ञानाचं लाँचिंग केलं जाईल. दूरसंचार विभागाने महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे.
नवीन तंत्रज्ञानात दूरसंचार कंपन्यांना आपला डेटा दूरसंचार विभागाशी शेअर करावा लागणार आहे. कंपन्यांना आपले नेटवर्क अपडेट करावे लागणार आहे. हे नेटवर्क सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (सीआयईआर) ला वापरता येईल असे अपडेट करावे लागणार आहे. एवढंच नाही तर कंपन्यांना सिम कार्ड आणि मोबाइल ब्लाॅक करण्याचे अधिकारही सीआयईआरला द्यावे लागणार आहेत. डेटाचा वापर फक्त मोबाइलचा शोध घेण्यासाठी केला जाणार आहे.
हेही वाचा -
शेअर बाजारात २ दिवसांत ५ लाख कोटींचा चुराडा कसा झाला?