Advertisement

बँक दिवाळखोरीत गेल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार पैसे

या बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन अर्थात डीआयसीजीसी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बँक दिवाळखोरीत गेल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार पैसे
SHARES

मागील काही वर्षात देशातील अनेक बँका दिवाळखोरीत गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या आहेत.  त्यामुळे आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बँक बुडीत निघाल्यास बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन अर्थात डीआयसीजीसी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बुडीत  बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयाची माहिती दिली.

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक दोन वर्षांपूर्वी दिवाळखोरीत निघाली. या बँकेत अनेकांचे पैसे अडकले होते. त्यानंतर येस बँक, लक्ष्मी बँक यासारख्या अनेक बँकांचे ठेवीदार अजूनही पैशांच्या प्रतिक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा ठेवीवारांना मिळणार आहे. 

डीआयसीजीसी कायद्यातील दुरुस्ती विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कायद्यात ही दुरुस्ती केल्यानंतर खातेधारकांना आणि ठेवीदारांच्या पैशाला आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. ज्यामुळे कोणतीही बँक बुडाली तर विमा संरक्षणानुसार खातेधारकांना आणि ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत पैसे मिळणार आहे. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू असणार आहे, अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.

कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाल्यास डीआयसीजीसीकडून ठेवीदारांना आणि खातेदारांना विमा कवच दिले जाते. त्यानुसार ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत रुपये दिले जातात. पण, हे पैसे बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आणि तिचे लिक्विडेशन म्हणजे संपत्ती विकल्यानंतरच दिले जातात. केंद्राच्या नव्या निर्णयामुळे ठेवीदारांना पैसे मिळण्याचा कालावधी निश्चित झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा