आयकर परतावा करताना कुठून आणि कसा कर वाचवता येईल याचा प्रयत्न सगळ्यांकडूनच केला जातो. पण यापुढे कर वाचवण्यासाठी काही तरी चुकीचं करायच्या विचारात असाल तर सावधान! कारण कर वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न तुम्हाला तुरूगांत नेऊ शकतात.
आयकर परताव्यात कमी उत्पन्न दाखवणाऱ्या आणि कपात वाढवून दाखवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा आयकर विभागानं उचलला आहे. त्यानुसार जो कोणी आयकर परतावा करताना काहीही चूक करेल, चुकीची माहिती देईल, त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना करदात्यांना देण्यात आल्या आहेत.
आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवण्यासाठी वा कपात वाढवून दाखवण्यासाठी करदात्यांकडून नाना शकला लढवल्या जातात. जानेवारी महिन्यात चुकीचा किंवा खोटा आयकर परतावा भरून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश आयकर विभागानं केला होता. या सर्व बाबींची दखल घेत आयकर विभागानं आता अशा करदात्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे जर एखादा करदाता चुकीचा परतावा करताना आढळला, तर त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई तर होणार आहेच, पण त्याचबरोबर फौजदारी कारवाईही करण्यात येणार असल्यानं ही चूक करदात्यांना थेट तुरूंगात नेणार आहे.
हेही वाचा
आयकराचा दंड १ कोटीचा, शिक्षा केवळ ५-१० हजारांची!