मुंबईत एका बाजूला वायू प्रदूषणाचा स्तर वाढत असताना रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मुंबईत २०१२ ते २०१७ या मागील ५ वर्षांमध्ये १० लाखांहून अधिक वाहनांची आरटीओमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुंबईत ३२ लाख वाहने रस्त्यावर धावत आहेत.
उच्च उत्पन्न वर्गातील ग्राहक प्रामुख्याने वाहन खरेदीदार समजले जातात. मात्र मागील काही वर्षांमध्ये मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने अशा ग्राहकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला आहे. सोबतच सहज वाहन कर्ज मिळत असल्याने त्याचाही वाहन खरेदीला हातभार लागला आहे.
वाहन खरेदीचा कल पाहता दुचाकी वाहनांची संख्या कारच्या दुप्पट होईल, असं म्हटलं जात आहे. सद्यस्थितीत कारची संख्या १० लाखांच्या जवळपास असून दुचाकींची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे.
सन १९८०-८१ मध्ये मुंबईत ३.२ लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. तर २०००-२००१ मध्ये १०.२९ लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. जाणकारांच्या मते, वाहन खरेदीच्या वाढलेल्या गतीकडे पाहता पुढच्या ५ ते १० वर्षांमध्ये मुंबईत गाड्यांची संख्या दुप्पट वाढणार आहे.