मुंबई महापालिकेच्या शाळांना आता घरघर लागू लागली असून मागील ३ वर्षांमध्ये मराठी माध्यमाच्या शहर आणि पूर्व उपनगरांमधील २२ शाळा बंद झाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या कमी झाल्यामुळे या शाळांचं दुसऱ्या शाळांमध्ये विलिनीकरण करून त्या बंद करण्यात आल्या आहेत.
महापालिका शाळांमधील मुलांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पटसंख्येअभावी अनेक शाळांना टाळं लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या व सरासरी पटसंख्या कमी झाल्यामुळे परिणामकारक देखभाल वचांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांच्या विलिनीकरणाचे प्रस्ताव शिक्षण समितीला सादर केले आहेत.
पटसंख्येअभावी विलिनीकरण करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये पूर्व उपनगरांतील विविध माध्यमांच्या २२ शाळा आणि शहरातील १७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये पूर्व उपनगरांत मराठी माध्यमाच्या १५ आणि शहरात ७ अशाप्रकारे एकूण २२ मराठी शाळा या सन २०१७ ते २०१९पर्यंतच्या शैक्षणिक वर्षांत बंद करण्यात आल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
केवळ २ ते ३ वर्षांमध्ये महापालिकेच्या शहर आणि पूर्व उपनगरांतच ३९ शाळा बंद झाल्या आहेत. पश्चिम उपनगरांतील शाळांची संख्या वेगळी असून ती समोर आल्यास या शाळांची संख्याही ५० च्या आसपास पोहोचते. मात्र, त्यातील मराठी शाळांची संख्या अधिक असल्यामुळे या शाळांमधून मराठी माध्यम हद्दपार होऊ लागलंय, असं आता समोर आलं आहे.
शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पटसंख्या कमी झाल्यामुळे अनेक शाळांचं विलिनीकरण करावं लागतं. या विलिनीकरण करताना पटसंख्या कमी झालेली शाळा बंद करावी लागत आहे. पण, मराठी माध्यमांमधून मुलांनी शिकावं यासाठी सेमी इंग्लिशचा वापर करण्यात येत असून मराठी माध्यमांमध्ये कशाप्रकारे मुले वळतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिक्षण विभाग करत असल्याची माहिती सातमकर यांनी दिली.
पूर्व उपनगरे: २२
शहर: १७
मराठी: २२
हिंदी: ०३
तेलगू: ०३
ऊर्दू: ०३
इंग्रजी: ०२
गुजराती: ०५
कन्नड: ०१
हेही वाचा-
यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा होणार द्विभाषिक
त्या शाळांना अनुदान मिळणार का?