पावसाळ्याआधी मुंबई महापालिकेकडून धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केले जातं. यंदा मुंबईत एकूण ४८५ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये पालिकेच्या ३४, सरकारी २७ व खाजगी ४२४ इमारती आहेत. यापैकी १४८ धोकादायक इमारती पालिकेने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर ११२ इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन खंडीत केलं आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागातील धोकादायक इमारती, महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आपत्कालीन व्यवस्थापन कायदा-२००५ नियमांनुसार अतिक्रमणांच्या आस्थापनांवर कार्यवाही तातडीने करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक स्थितीत असलेल्या आणि कधीही कोसळतील अशा ४८५ इमारती आहेत. या इमारतींपैकी ११२ इमारतींची आतापर्यंत वीज व पाण्याची जोडणी तोडण्यात आलेली आहे. इमारती कोसळून होणा-या दुर्घटनांमध्ये जिवीतहानी होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालिकेने धोकादायक ठरवलेल्या १०७ इमारती रिकाम्या केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, २३० धोकादायक इमारती तोडण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे. सध्या ७३ धोकादायक इमारतींची प्रकरणे न्यायालयात वर्ग आहेत.
हेही वाचा -
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १२०० रुपये दंड
१८-४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण पालिकेच्या 'या' ५ केंद्रातच, पण...