राज्यात लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला असून, १ मेपासून १८ हून अधिक वयाच्या लोकांचं लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे (BMC) १ मे रोजी फक्त १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर तयारी करण्यात आली आहे.
तसंच कोविन (COwin) ॲपवर नोंदणी केलेल्यांचंच लसीकरण होणार आहे. लशींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
१) बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
२) सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३) डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
४) सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५) वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचं आवाहन जनतेला केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षी १ मे ला लॉकडाऊनच होता. या वर्षी देखील फारसा फरक पडलेला नाही. आपण लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घातले आहेत. कालच उच्च न्यायालयाने विचारलं आहे की कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं याहून कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता फारशी येणार नाही.
पुढे ते हे देखील म्हणाले की, आपल्याकडे दिवसाला १३ लाख लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु केंद्राकडून मर्यादीत साठा मिळत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी सध्या ३ लाख लसी आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला जसजशी लस उपलब्ध होईल, तसतशी आपण ही संख्या वाढवत जाणार आहोत.
हेही वाचा