Advertisement

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, दुसरी लाट आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशातच मुंबईसह राज्यभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?
SHARES

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, दुसरी लाट आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशातच मुंबईसह राज्यभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. काही महिन्यांनी कोरोनाची तिसरी लाटही राज्यात धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच माहिती दिली आहे. तसंच, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, असे टोपे यांनी नमूद केले.

राज्यात दररोज ६० ते ६८ हजारांच्या दरम्यान नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा ही निर्माण झाला आहे. एकीकडं कोरोना रुग्णांची संख्या वाढते, तर दुसरीकडं लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यूही झाला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट जुलै किंवा ऑगस्टमध्ये येवू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही भीती लक्षात घेता ही लाट येण्याआधी आपण आवश्यक पावले टाकायला हवीत. प्रामुख्यानं ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध असेल यासाठी नियोजन केलं गेलं पाहिजे. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या लाटेत ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेवून आतापासूनच पावले टाकावीत. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारला गेला पाहिजे. आता जी धावपळ चालली आहे ती तिसऱ्या लाटेत दिसता नये, अशी सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा