महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ५२२ नवीन रुग्ण आढळले होते तर मंगळवारी ७२९ कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं कोरोनाबाबतचा तपशील रात्री उशिरा जाहीर केला. त्याचप्रमाणं, कोरोनानं मृत्यू झालेल्यांचं प्रमाणही वाढलं असून, सोमवारी दिवसभरात ३१ जणांचा बळी गेला आहेत.
दिवसभरात कोरोनाबाधित ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ इतका झाला आहे. मागील २४ तासांत कोरोनाबाधित ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २५ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी १६ पुरूष तर १५ महिला रुग्ण आहेत.
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ०४४ झाली असून, पुण्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७६ इतकी असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा दिली.
सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर १५ महिला आहेत. ३१ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २० रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या ३१ रुग्णांपैकी २० जणांमध्ये (६५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४०० झाली आहे.