जोरदार पावसात धोकादायक ठरणाऱ्या मुंबईतील मिठी नदीच्या (mithi river) साफसफाईचं काम ७७ टक्के पूर्ण झालं असून मुंबईतील ३३६ पुरांच्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे ३२४ पंप कार्यान्वित असल्याची माहिती प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना मंगळवार २६ मे रोजी दिली. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेतला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता तसंच रेल्वे, विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पुराच्या ठिकाणी पंप
यावेळी मुंबईतील पूर व्यवस्थापनाचा आढावा घेताना, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे (flood area in mumbai) असून तिथं पाणी उपसणारे ३२४ पंप कार्यान्वित आहेत. पुराचं पाणी उपसण्यासाठी ६ हजार लिटर्स प्रती सेकंद या क्षमतेची यंत्रणा सुरु आहे. मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी मान्सूनपूर्व सुरक्षिततेसाठी तसंच डेब्रिज काढण्याची कामे सुरु आहेत. मुंबईतील ४०० किमी नाल्यांचं ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे, तुंबणारे नाले स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. हिंदमाता, कलानगर आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. पावसाळ्यात उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणं शक्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
नालेसफाई महत्त्वाची
त्यावर बोलताना, मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधानिशी काम करू लागलो आहोत. नाले सफाई, त्यांचं खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणं महत्त्वाचं आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे पाईप्स मोकळे आहेत का ते पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात COVID_19 साठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks , आपत्ती व्यवस्थापन मंत्री @VijayWadettiwar , राज्यमंत्री @prajaktdada , मुख्य सचिव अजोय मेहता, तसेच रेल्वे, विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी सहभागी. pic.twitter.com/YLB3kKLz2f
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2020
रोगराईशी मुकाबला
राज्यात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, १ ते २ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा अल निनोचा प्रभाव नाही, असं म्हटलं जात आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. राज्यात ११ जून रोजी पाऊस येण्याचाही अंदाज आहे.
हेही वाचा - फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर देण्याची गरज- मुख्यमंत्री
सध्या आपण COVID_19 चा मुकाबला करीत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचं आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करा. रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा. आपण आपत्तीत बचाव कार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स, मास्क कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतकं आता तंत्रज्ञान विकसित झालं आहे. मात्र, तरीदेखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहून चांगला समन्वय ठेवावा. विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते. त्याप्रमाणे रेल्वेने पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं पाहिजे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
पुराचा फटका बसू नये
गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं. अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा. शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणं, पडले तर तत्काळ बुजविणं महत्त्वाचं. दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य, औषधींचा पुरेसा पुरवठा करा. विभाग व जिल्हावार बैठकांमध्ये डॉक्टर्सना सहभागी करून पावसाळ्यातील रोगांसंदर्भात नियोजन करा, असे निर्दशही उद्धव ठाकरे यांनी दिले
इथं संपर्क साधा
मुंबईत पूर इशारा यंत्रणा विकसित. प्रभाग पातळीवर किती पाऊस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते. सध्या १४० पर्जन्यमापन केंद्रे असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल ॲप विकसित. तसंच उमंग मोबाईल ॲपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल. मुंबईतील हवामान विभागाशी ०२२-२२१५०४३१ आणि ०२२-२२१७४७१९ या क्रमांकावर तसेच acwc.mumbai@gmail.com या ईमेलवरून संपर्क साधता येइल.
हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो सुविधा