मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल (field hospital) उभारणीवर भर दिला पाहिजे, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी नुकताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन, डॉक्टर्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा (coronavirus) प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे. मला तुमच्याकडे पाहून हुरूप येतोय. ही साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात, यात काही शंकाच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिलं.
हेही वाचा - खासगीपेक्षा पालिका रुग्णालयांतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चारपट
फिल्ड हॉस्पिटल
मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसंच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाऊले उचलत आहोत. पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसंच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पावसाळी आजार
मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू व आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये परंतू आपले नियोजन चांगलं आहे. येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
यावेळी राज्याचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन उपसंचालक डॉ.तात्याराव लहाने देखील उपस्थित होते.