आरे वसाहतीतील वन्यजीवांच्या जीवनशैलीत मानवी कृत्यांमुळे होणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी आरेत प्रवेश करण्यासाठी असलेला मुख्य रस्ता रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली.
हिरानंदनी, पवई, जोगेश्वरी, फिल्टरपाडा इत्यादी ठिकाणी जाणारी वाहने आरे वसाहतीतील रस्त्याचा वापर करतात. यामुळ गेल्या काही वर्षांत येथील प्रदूषण वाढले आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्यासारख्या प्राण्यांना मोकळेपणाने जंगलात वावरता येत नाही. वाहनस्वार व बिबट्या समोरासमोर आल्यास दोघांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळं रात्रीच्या वेळेस बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे.
आरे जंगलातून पवई-गोरेगाव रस्त्याच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरु आहे. याचा परिणाम जंगलातील प्राण्यांवर होत असल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली होती.