लंच ब्रेकच्या नावाखाली कामचुकारपणा करणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता सरकारने मोठा दणका दिला आहे. मंत्रालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आता अर्ध्या तासाच्या आत जेवण उरकून आपल्या जागेवर परतावं लागणार आहे. सरकारने तसा जीआरच काढला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयात कामासाठी आलेल्या सर्वसामान्यांना ताटकळत रहावं लागणार नाही.
नागरिकांची गैरसोय
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लंच टाईम हा एक तासाचा असतो. १ ते २ दरम्यान हा वेळ असतो. मात्र, आता कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासात जेवण करून पुन्हा काम सुरू करावे लागणार आहे. रोज मंत्रालयात राज्यभरातून शेकडो नागरिक कामासाठी येत असतात. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचारी जेवायला गेले आहेत, अशी उत्तरं दिली जातात. त्यामुळे नागरिकांना छोट्या कामांसाठीही खूप वेळ ताटकळत बसावं लागतं. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी सरकारला जीआर काढावा लागला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासात जेवन उरकून आपल्या जागेवर परतावं लागणार आहे.