घाटकोपर येथील कामराजनगरमधील नाल्यावरील अतिक्रमणाचा विळखा आता सोडवला जात असून येथील तब्बल १६० कच्च्या आणि पक्क्या बांधकामांवर महापालिका हातोडा चालवला आहे. त्यामुळे नाल्यावरील निम्मे अतिक्रमण हटवण्यात महापालिकेला यश आलं आहे.
घाटकोपरच्या कामराज नगरमधून जाणाऱ्या नाल्याशेजारील कांदळवनाच्या जागेवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत. ठाण्याच्या खाडीकडे जाणाऱ्या नाल्यावर झालेल्या झोपड्यांच्या अतिक्रमणांमुळे याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. आजवर या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई झाली नव्हती. परंतु, आता यासर्व अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कडक पाऊल उचलून हीसर्व बांधकामं जमीनदोस्त करून नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नाल्यावरील या अतिक्रमणाविरोधात एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सुरू आहे. मागील आठवड्यात येथील ६० कच्च्या आणि पक्क्या झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत येथील १६० बांधकामं हटवण्यात आल्याचं एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी स्पष्ट केलं. याठिकाणी एकूण २००च्या आसपास अनधिकृत बांधकामं आहेत. ही सर्व जमिन कांदळवनाची असली तरी नियोजन प्राधिकरण म्हणून वन विभागासह महापालिकेने संयुक्त कारवाई केली असल्याचं कापसे यांनी स्पष्ट केलं.