महाराष्ट्रात टोलचा मुद्दा तापला आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे काँग्रेसनेही या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आरोप करत टोल घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा असून टोलचा पैसा कुठे जातोय याची माहिती राज्य सरकारने द्यावी, असे म्हटले होते.
राज ठाकरेंच्या या आरोपानंतर आता काँग्रेसनेही टोलमधून मिळणाऱ्या पैशांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. टोलचा पैसा जातो कुठे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
काँग्रेस काय म्हणाली?
"राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलवसुलीत भ्रष्टाचार झाल्याची कबुली स्वतः दिली आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल माफ केला असता का?", असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहन चालक-मालकांकडून अजूनही टोल वसूल केला जात असेल तर तो कोणाच्या खिशात जातो?
ते म्हणाले, “रोज टोलमधून जमा होणारी शेकडो कोटींची रक्कम कुठे जाते? एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी वाईट का आहे, राज्यातील लोकांना रस्ते, राज्य महामार्गावर पायाभूत सुविधा का उपलब्ध नाहीत?
हा पैसा जातो कुठे, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि जनहिताच्या या प्रश्नावर केंद्रातील ईडीप्रेमी भाजप सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी टीकाही वर्षा गायकवाड यांनी केली.
हेही वाचा