राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली असून मुंबईनेही २० हजारांचा (२०,१५०) आकडा पार केला आहे. रविवार १७ मे रोजी दिवसभरात २३४७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात रविवारी ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सर्वाधिक चाचण्या
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढं होतं. ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतकं वाढलं आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होतं. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढं आहे.
६३ मृत्यू
राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली असून एकूण संख्या ११९८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९,औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसंच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)
इतकं सर्वेक्षण
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १४ हजार ९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केलं असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे.