सध्या कोरोनाव्हायरसनं जगभर थैमान तर घातलंच आहे. आता आणखी एक असमानी संकट काही देशांवर घोंघावतंय. हे संकट आहे टोळ अर्थात इंग्रजीमध्ये त्याला Locusts म्हणतात. महाराष्ट्रात देखील या किटकानं शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भितीचं वातावरण आहे. नेमका हा किटक आहे तरी काय? त्यापासून काही धोका आहे का? कशाप्रकारे हा हल्ला करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. यावर आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे 'जळालेली जमिन'. म्हणजेच जिथं ही टोळधाड पडते, त्या भूप्रदेशातली पिकं पूर्णपणे उध्वस्त होतात. विशेष म्हणजे जगातला कुठलाच देश या टोळ धाडीपासून सुरक्षित नाही. अगदी प्राचिन साहित्य आणि बायबलमध्येही या टोळधाडीच्या उपद्रवाचा उल्लेख आहे.
टोळधाड हा शब्द शेतीवर हल्ला करणाऱ्या किटकांविषयी वापरला जातो. 'टोळ' हा एक नाकतोडा प्रजातीचा उपद्रवी किटक आहे. तो हिरवी पानं खातो. याचं तोंड घोड्यासारखं असल्यानं त्याला विदर्भात 'घोड्या' असंही म्हटलं जातं.
सगळ्याच प्रकारच्या वनस्पतींना धोकादायक ठरणारे हे टोळ किटक करोडोंच्या संख्येनं एखाद्या प्रदेशावर हल्ला करतात. बघता बघता शेतातली उभी पिकं खाऊन टाकतात. आणि या यामुळं शेतीचं होणारं नुकसानाचं प्रमाण हे अतिशय मोठं असतं. यापैकी वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ, मुंबई टोळ या जाती; विशेषतः यातली वाळवंटी टोळ भारतात सर्वाधिक नुकसान घडवते.
टोळचं प्रमुख खाद्य हे हिरवा चारा आहे. अनेकदा टोळ शेतच्या शेत साफ करतात. याचा परिणाम शेतीवर आणि अन्न पुरवठ्यावर होऊ शकतो.
टोळ माणसांवर हल्ला करत नाहीत किंवा तो माणसांना चावत नाही. दुसरा म्हणजे या किटकांपासून रोगराई पसरण्याचा उल्लेख रोमन इतिहासकार लिवी यानं इसवीसनपूर्व २०३ मध्ये केला आहे. चीनमध्ये इसवीसन ३११ मध्ये टोळढाडीमुळे रोगराई पसरली होती. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, असा त्यावेळी दावा करण्यात आला होता.
भारतात अनेकवेळा लहान मोठ्या टोळधाडी होऊन गेल्या आहेत. वाळवंटी टोळांचं मूळ स्थान हे सौदी अरेबिया किंवा अरेबियन द्विपकल्प आहे. मान्सुनच्या वाऱ्यांमागोमाग ते पाकिस्तानमार्गे राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रवेश करतात.
पण वातावरणातील बदलामुळे जिथं पाच वर्षातून एकदा चक्रीवादळ यायचं, त्या अरबी समुद्रात मागच्या दोन वर्षापासून एकाच वर्षात २ ते ३ चक्रीवादळं निर्माण होतायेत. चक्रिवादळामुळे पाऊस पडतो. त्यामुळे त्याच प्रदेशात टोळांना खाद्य आणि प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण मिळतं. म्हणून त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होते.
माळढोक सारखे अनेक पक्षी टोळ किटकाचे क्षत्रू आहेत. पण माळढोक पक्षी तर महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे. अन्य प्रदेशातही या पक्ष्याची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे टोळ किटकाला आता मोकळं रान मिळालं आहे.
काही देशांमध्ये हे किटक खाद्य आहे. आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश, आशिया खंड इथं किटकांचा भोजन म्हणून उपयोग केला जातो. साधारणपणे फ्राय करतात किंवा वाफेवर शिजवले जातात.
हेही वाचा