मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसंदिवस वाढत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. या लाॅकडाऊनला विरोध म्हणून वांद्रे इथं कामगार जमू लागले. पोलिसांनी समजावून देखील आपल्या निर्णयावर ठाम असणाऱ्या कामगारांना हटण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
मुंबईच्या वांद्रे पश्चिम स्थानकाजवळ दुपारी अचानक त्या परिसरातील कामगारांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. लाॅकडाऊनमुळे काम नाही, पैसे संपले, जेवणाच हाल होत असल्याचे सांगत नागरिक रस्त्यावर उतरले. लॉकडाऊनमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित लोक त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी जाण्यास विनवनी केली. मात्र हळूहळू हजारोंच्या संख्येने कामगार जमू लागल्याचं पाहून पोलिसांनी वाढीव फौज मागवली. ही गर्दी लक्षात घेता अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हे पोलिसांनी कामगारांना समजावून देखील सांगितलं.
पण, आपल्या हट्टावर ठाम असलेल्या कामगारांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी आता या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसंच कोरोना महमारी नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.