Advertisement

उद्या होणार बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मंगळवार २७ जुलै रोजी होणार आहे.

उद्या होणार बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ
SHARES

मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार २७ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळचे सभापती विजय नाहटा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अनिल डोंगरे आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मोठा पुनर्विकास प्रकल्प

दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड (jitendra awhad) यांनी दिली.वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर  जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+३ मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. 

सदरहू चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देण्यासाठीचा तसंच सदरहू ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर  या योजनेद्वारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.

हेही वाचा- महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भूयारीकरणाचा टप्पा पूर्ण

राज्य शासनाच्या जागेवर १५,५९३  गाळे, स्टॉल्स व अधिकृत झोपड्या आहेत. बीडीडी चाळींचा विकास नियंत्रण नियमावली ३३(९) ब) च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यात आली आहे.

बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना ५०० चौरस  फुट चटई क्षेत्रफळाची आकाराची घरे वितरीत करण्यात येतील. पुनर्विकास प्रकल्प टप्याटप्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाश्यांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. नायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पुनविकास प्रकल्प येत्या ७ वर्षांत, तर  वरळी येथील प्रकल्प येत्या ८ वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे, अशी माहितीही मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.

प्रस्तावित प्रकल्पाचा तपशील

नायगाव योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळयांची संख्या ३ हजार ३४४ (निवासी ३२८९+ अनिवासी ५५) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. ना. म. जोशी मार्ग योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या २ हजार ५६० (निवासी २५३६+ अनिवासी २४) असून पुनर्वसन इमारत २२ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य  इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. 

वरळी  योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या ९ हजार ६८९ (निवासी ९३९४+ अनिवासी २९५) असून पुनर्वसन इमारत ४० मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य  इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे. अशा प्रकारे तीनही योजनेत मिळून १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळे (निवासी व अनिवासी) निर्माण करण्यात येणार आहेत. तीनही बीडीडी चाळींच्या प्रकल्प जागेवर भाडेकरूंना पुनर्वसन सदनिका व अंतर्गत सोई सुविधा कशा असतील याची माहिती मिळण्यासाठी नमूना सदनिका (Sample Flat) बांधण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा