भिवंडी इथं सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या आसपास ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. तर २० ते २५ जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावर एनडीआरआएफ, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. नुकतीच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.
सोमवारी पहाटे ३.४० वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये २१ कुटुंबं राहत होती. इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत.
दरम्यान घटनेनंतर स्थानिक लोकांनी २० लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ही इमारत ३० वर्षे जुनी होती. आधीच धोकादायक घोषित केलं होतं. दोनदा नोटिसही बजावण्यात आली होती.