मध्य वैतरणा जलाशयात २० मेगावॅटचा जलविद्युत, ८० मेगावॅटचातरंगता सौरऊर्जा असा एकूण १०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यास स्थायी समितीनं मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होणार आहे. तसंच, वीज खर्चात प्रतिवर्षी सुमारे २४ कोटी १८ लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळं संकरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात प्रवेश करणारी मुंबई महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.
मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचं आणि ५६५ मीटर लांबीचं मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधण्यात आलं. या धरणाचं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असं नामकरण केलं आहे. धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीनं पाणीपुरवठा तसंच, जलविद्युत निर्मितीसाठी संयुक्तिक बर्हिगामी जलवाहिनी टाकण्यात आल्या होत्या. या जलाशयातून जलविद्युत निर्मितीसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १२ डिसेंबर २०१९ रोजी पालिकेला परवानगी दिली.
महापालिकेची विजेची मागणी अधिक असल्यानं बांधा, वित्तपुरवठा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर जलविद्युत निर्मितीसह सौरऊर्जा निर्मिती अधिक फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे. ही शिफारस स्वीकारून महापालिकेनं कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर मॉडेलनुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.
केंद्रीय व महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५३६ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचा खर्च व पुढील २५ वर्षे प्रकल्पाचे परिचालन व परिरक्षण खर्च विकासकाला करावा लागेल. प्रकल्पाची मालकी ही महापालिकेची असली तरी खर्चाचा भार नसेल. विकासकांनी ७ महिन्यांत आर्थिक नियोजन केल्यानंतर २ वर्षांत या प्रकल्पाचं काम होईल. या प्रकल्पातील वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये पुरवली जाणार आहे.