मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली सध्या 'किडझेनिया' सारख्या खासगी ठिकाणी आयोजित केल्या जात आहेत. अशा ठिकाणी सहली आयोजित करून मुलांच्या संगणकीय कौशल्यांत वाढ करण्याचा हेतू असला तरी मुलांना ऐतिहासिक वास्तूंची ओळख होणंही आवश्यक आहे. त्यामुळे शाळांच्या सहली गड, किल्ले आदी ठिकाणी आयोजित करण्याची मागणी नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या सहली ऐतिहासिक ठिकाणी आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशाप्रकारे सहली आयोजित केल्यास शाळकरी मुलांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळेल आणि या मुलांमध्ये गिर्यारोहणाची आवडही निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
महापालिका शाळांमधील मुलांना सर्वकष ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने महापालिका अनेक उपक्रम राबवत असते. या उपक्रमांतर्गत इयत्ता ४ थी ते ७ वी पर्यँतच्या विद्यार्थ्यांच्या सहली घाटकोपर येथील किडझेनिया इथं आयोजित करण्यात येतात. इथं मुलांना प्रसार माध्यमांचा वापर कसा करायचा? याचं ज्ञान देण्यात येतं.
या ज्ञानासोबतच मुलांना ऐतिहासिक वास्तुंची माहिती देणंही आवश्यक असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच सहली गड, किल्ले आदी ऐतिहासिक ठिकाणी आयोजित केल्या जातात, त्याच धर्तीवर महापालिका शाळांमधील मुलांचया सहलीही राज्यातील प्रमुख गड आणि किल्ल्यांवर आयोजित करून त्यांना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ओळख करून द्यावी, असं समिता कांबळे यांनी म्हटलं.
हेही वाचा-
२३१ अनधिकृत शाळांवरून शिक्षण समितीत गदारोळ