Advertisement

मुंबईच्या पोटात सारणार काँक्रिट व्हॅल्यूट पंप: किर्लोस्कर ब्रदर्स करणार सर्जरी


मुंबईच्या पोटात सारणार काँक्रिट व्हॅल्यूट पंप: किर्लोस्कर ब्रदर्स करणार सर्जरी
SHARES

मुंबईचे अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खाली असून समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे अनेकदा पाणी तुंबून पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे उपाययोजना राबवण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्सने तयारी दर्शवली आहे. बँकॉकच्या थायलंडमध्ये चुहूबाजूने पाणी भरून त्याचा अनेक दिवस निचरा न झाल्याने किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या तंत्रज्ञांनी जमिनीच्या पोटात तयार केलेल्या बोगद्यातून महाकाय काँक्रिट व्हॅल्यूट पंप बसवून अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीचं संकट रोखण्याची प्रभावी यंत्रणा उभारली. अशीच यंत्रणा राबवून मुंबईच्या पोटात काँक्रिट व्हॅल्यूट पंप बसवून पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा विचार महापालिकेच्यावतीनं सुरू आहे


आता पाणी तुंबणार नाही

२०११मध्ये थायलंड शहरात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरानंतर समुद्राचं पाणी संपूर्ण शहरात घुसून हाहाकार माजला होता. दोन ते तीन महिने बँकॉकमध्ये चहुबाजींनी पाणीच पाणी तुंबून राहिलं होतं. थायलंड शासनाने अशी परिस्थिती पालटवू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा जगभरात शोध घेतला आणि याची जबाबदारी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीकडे सोपवली. त्यामुळे या कंपनीच्या तंत्रज्ञांनी जमिनीच्या पोटात महाकाय काँक्रिट व्हॅल्यूट पंप बसवून अतिवृष्टी किंवा समुद्राच्या भरतीचं संकट रोखण्याची प्रभावी यंत्रणा २०१७ पर्यंत पूर्ण केली. त्यामुळे पुढील शंभर वर्षात कितीही मुसळधार पाऊस किंवा समुद्रांच्या लाटांची उंची कितीही वाढली तरी बँकॉक नगरात पाणी तुंबले जाणार नाही.


याबाबतची बैठक पडली पार

याच किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीची मदत आता मुंबईतही घेण्याचा विचार केला जात आहे. मुंबईत वारंवार उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने महापौर निवासस्थानी याबाबतची बैठक पार पडली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. यावेळी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी आपल्या तज्ज्ञ सहकाऱ्यांसह बैठकीत विविध उपाययोजनांचं सादरीकरण केलं.


कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी...

मुंबईचा बहुतांशी भाग खोलगट असल्यानं जास्त पाऊस पडला तरी पाणी बऱ्याचवेळा तुंबून राहतं. त्यातच समुद्राला मोठी भरती आली तरी पाणी वाहून जात नाही. पुराचं पाणी पसरू शकेल अशा खुल्या जमिनीची कमतरता आणि सतत चालणारी प्रचंड वाहतूक हेही प्रश्न असल्यानं या सगळ्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने मुंबईसाठी काही कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीनं हे सादरीकरण केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा