मुंबई महापालिकेनं सोमवारपासून मुंबईतील मोजक्या ४१ ठिकाणी संध्याकाळी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या अखेरच्या पंधरवड्यात ‘स्वच्छ भारत’चं पथक पाहणीसाठी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे संध्याकाळच्या साफसफाईच्या अंमलबजावणीसाठी पालिकेची धावपळ उडाली आहे.
देशातील विविध शहरांमध्ये स्वच्छताविषयक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी एक ते सात तारांकनांसाठी अटी आणि शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. यात शहरामध्ये संध्याकाळी स्वच्छता केली जाते का? या अटीचा देखील यात समावेश आहे.
पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीतील काही भागांत उदाहरणार्थ नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट आदी परिसरांत सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छता केली जाते. पालिकेचे सफाई कामगार उर्वरित मुंबईत दररोज नित्यनियमानं सकाळी साफसफाईचे काम करतात. मात्र संध्याकाळच्या वेळी पालिकेचा एकही सफाई कामगार दृष्टीस पडत नाही.
‘स्वच्छ भारत’ अभियानातील स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी पालिकेने मुंबईतील ४१ भागांमध्ये संध्याकाळी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणांचा त्यात समावेश आहे. मुंबईमध्ये सकाळी आणि संध्याकाळी साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांचे तोकडे संख्याबळ आहे. त्यामुळे संध्याकाळी साफसफाईसाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या कामगारांसोबत संस्थांच्या कामगारांवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानाचं पथक येत्या १५ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होत आहे. हे पथक ३१ डिसेंबपर्यंत मुंबईतच राहणार आहे. या काळात मुंबईत संध्याकाळी साफसफाई केली जाते का याची पथकामार्फत पाहणी केली जाणार आहे.
हेही वाचा