मुंबईतील गोवंडी मानखुर्द मंडाला येथे काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील तब्बल ६३ भंगार गोदामांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे येथील भंगार गोदामांची संख्या कमी झाली असून भविष्यात गोदामांमुळे लागणाऱ्या आगीचं प्रमाण कमी होईल, असा विश्वास श्रीनिवास किलजे यांनी व्यक्त केला.
मानखुर्द-मंडाला खाडीलगत मोठ्या प्रमाणात भंगार गोदामं आहेत. या गोदामातील भंगार तसेच रासायनीक द्रव्यामुळे बऱ्याच वेळा आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. मागील आठवड्यात अशाप्रकारे मोठ्या आगीची दुर्घटना उद्भवली होती. या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील ६३ भंगार गोदामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ६ भंगार गोदामांच्या मालकांवर रासायनिक द्रव्य साठवणे तसेच अन्य कारणांसाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलं. तर १६ गोदामांची वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे याठिकाणी लागणाऱ्या आगीच्या घटना नियंत्रणात येतील, असं किलजे यांनी स्पष्ट केलं.