मुंबईच्या समुद्रात गाडी पोहताना पाहिली आहे का ओ कधी ? नाही ना... मुंबईच्या वसईच्या भुईगाव परिसरात बुधवारी सकाळी एक रिकामी कार पाण्यावर तरंगताना दिसली. जवळच्या कळंब बीचवरुन भरतीच्या वेळेस ही कार पाण्यात खेचली गेल्याचा अंदाज आहे. दरम्यान, कार पाण्यावर तरंगत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. बीचपासून ५०० मीटर अंतरावरती एक मारुती स्विफ्ट कार पाण्यात तरंगताना वसईगाव पोलिस स्टेशन मधील दोन कॉन्स्टेबलांना दिसली. त्यावेळेस कारचा केवळ वरचा भाग पाण्याच्या वर दिसत होता. या तरंगणाऱ्या कारला जवळून पाहिले असता ती कार रिकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेतीमध्ये रुतलेल्या या कारला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचाः- मध्य रेल्वे मार्गावर 'चिखलोली' नवा थांबा
काळंब बीचवरती काही तरुण पार्टी करत होते. तिथूनही ही कार वाहत आली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गाडीच्या मालकाचा शोध सुरु आहे. दरम्यान, स्थानिक मच्छीमारांनी दोरीच्या साह्यायाने गाडी बाहेर काढण्यास मदत करत आहेत. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १०.३० च्या सुमारास भरती आली होती. त्याचवेळेस ही गाडी समुद्रात खेचली गेली असावी. आता पुन्हा ओहोटी आल्याशिवाय ही कार खेचून बाहेर काढता येणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नववर्ष स्वातच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वसई विरार भागामध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्याबरोबर नववर्षाची पार्टी करणाऱ्या लोकांची गर्दी टाळण्यासाठी या विभागातील सर्व बीचेस बंद करण्यात आले आहेत. तरी देखील ही कार इथे आली कशी? याचा पोलिस तपास करत आहेत.