Advertisement

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचं नवं यंत्र दाखल झालं असून, या यंत्रामुळं कस्तुरबामधील चाचण्यांच्या क्षमतेत ३०० नं वाढ झाली आहे.

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता महापालिकेच्या रुग्णालयांसह अनेक क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अशातच खासगी प्रयोगशाळांकडून करोना चाचण्या करून घेणे खर्चीक असल्याने आता पालिकेच्या प्रयोगशाळांमधील चाचण्या करणाऱ्या यंत्रांची संख्या वाढविण्याकडे भर दिला आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचं नवं यंत्र दाखल झालं असून, या यंत्रामुळं कस्तुरबामधील चाचण्यांच्या क्षमतेत ३०० नं वाढ झाली आहे. त्यामुळे कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्या करणं शक्य होणार आहे.

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत एक आरटीपीसीआर यंत्र उपलब्ध होते. याची क्षमता ३०० चाचण्यांची आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेनं नवे यंत्र खरेदी केलं असून, ते कार्यरत झालं आहे. त्यामुळे कस्तुरबामध्ये प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्या करणे शक्य होणार आहे. कूपर रुग्णालयातही नवे यंत्र खरेदी करून चाचण्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याची क्षमता दरदिवशी सुमारे ३०० चाचण्यांची असणार असल्याची माहिती मिळते. केईएममध्येही नवे यंत्र खरेदी केले असून ते लवकरच कार्यरत होणार आहे.

दरदिवशी सुमारे २०० ते ३०० नमुने तपासणीची क्षमता असली तरी नमुने गोळा करण्यापासून तपासणीसाठी तंत्रज्ञ, अहवाल तयार करणं यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यानं तारेवरची कसरत होत असल्याचं समजतं. मेट्रोपोलिसला बंदी घातली असली तरी चाचण्यांवर याचा परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट करत महापालिकेनं आणखी ३ खासगी प्रयोगशाळांशी करार केल्याची माहिती समोर येत आहे. या तिन्ही प्रयोगशाळांची एकत्रित दरदिवशी सुमारे ९०० चाचण्यांची क्षमता आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली असली, तरी राज्यात या आजाराने बळी गेलेल्यांचा आकडा ही लक्षणीय आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात १७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात सोमवारी दिवसभरात पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



हेही वाचा -

अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच

सुशांतच्या मत्यूचा त्याच्या वहिनीला धक्का, झालं निधन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा