कोरोना व्हायरस (coronavirus) संसर्गाच्या बाबतीत आपण सध्या दुसऱ्या फेजमध्ये आहोत. सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग इतका झाला नव्हता. परंतु आता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या १२ तासांत कोरोनाची लागण झालेले ४ नवीन रुग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर गेल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा- Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister) यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आपण कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या फेजमध्ये सध्या आहोत. हे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या ४ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या १२ तासांत ४ नवे रुग्ण आढळले आहेत. आपण फेज २ मधून ३ मध्ये जाऊ नये यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी देखील काळजी घेणं आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाता नागरिकांनी घरी राहावं, या दृष्टीने ३१ मार्चपर्यंतचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.
कोरोनाचा संसर्ग (COVID-19) होण्याचं प्रमाण ५० मध्ये १० असं आहे. सध्या १२ देश असे आहेत, ज्यामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून तिथून आलेले रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. या १२ देशांना आपण बंदी घातली आहे. भारतात परदेशातून आलेले बहुतेक रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यापासूनच इतरांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी फैलावू नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा- आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयितांना मुंबईत आणणार
मुंबईतील केवळ २ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून इतर रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. मुंबई-पुणे बससेवा बंद करण्यात आलेली नाही. तरीही लोकांनी कार्यालयात येण्यासाठी प्रवास टाळावा, मुंबई लोकल ट्रेनची सेवा बंद करण्यात आलेली नसली, तरी ती वेळ आमच्यावर आणू नये, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.