हे वाॅर अगेन्स्ट व्हायरस आहे. युद्ध हे घाबरून लढलं जात नाही. आपण सर्वजण मिळून जिद्दीने लढून हे युद्ध लढू. त्यासाठी सरकारच्या सर्व सूचनांचं पालन करा, अनावश्यक गर्दी टाळा. नाईलाजाने ट्रेन, बस इतर सेवा बंद करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री...
जिद्दीने लढावं लागेल
जगभरात कोरोनाने थैमान (coronavirus)घेतलेलं आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं युद्ध सारं जग मिळून लढत आहे. या युद्धात सर्वसामान्यांचं मिळणारं सहकार्य हीच सरकारची ताकद आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपली यंत्रणा सज्ज आहे. डाॅक्टर, नर्स, वाॅर्डबाॅयपासून, औषधे, आयसोलेशन, क्वारंटाईनची सुविधा आपल्याकडे पुरेशी आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठाही आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. घाबरून किंवा भीतीने युद्ध लढलं जात नाही. युद्ध हे जिद्दीने लढूनच जिंकावं लागतं.
यंत्रणा वीरासारखी लढतेय
हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. हे वाॅर अगेन्स्ट वायरस आहे. हे युद्ध लढत असताना सरकारकडून ज्या सूचना केल्या जातात, त्याचं तंतोतंत पालन व्हायला हवं. सीमेवर जसे आपले जवान लढत असतात, तसे आपले डाॅक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा, समाजसेवी संस्था, बस ड्रायव्हर सर्व सरकारी यंत्रणा वीरासारखी आपल्यासाठी घर दार कुटुंब, स्वत: च्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State - LIVE https://t.co/wLDyVqfjiW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 19, 2020
गर्दी टाळा
जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की, घरात रहा, अनावश्यक प्रवास करु नका, त्याच वेळेला ही यंत्रणा २४ तास आपल्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. जर ते आपल्यासाठी २४ तास काम करत असतील, तर आपलंही कर्तव्य आहे की, घरात राहून त्यांना सहकार्य करण्याचं. गर्दी टाळण्याच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांनी धार्मिक स्थळे बंद केली आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा, जत्रा, बाजारपेठा बंद करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. बस, ट्रेनमधील गर्दी ओसरली असली, तरी अजूनही अनावश्यक प्रवास सुरूच आहे. माझं आवाहन आहे की ही गर्दी पूर्णपणे बंद झाली पाहिजे.
ट्रॅव्हल हिस्ट्री लपवू नका
राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला आहे. विषाणू वेगाने वाढत आहे. बहुतेक सर्वच रूग्ण हे परदेशातून आले आहेत. त्यांच्या संपर्कातून इतरांना या विषाणूंची लागण झाली आहे. परदेशात अडकलेल्या सर्वांना शासनाकडून मदत करण्यात येईल. पण परदेशातून आलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हातावर स्टॅम्प मारलेले लोकं इकडेतिकडे फिरताना आढळून आले आहेत. तसं करू नका, आपली ट्रॅव्हल हिस्ट्री लपवू नका असं माझं इतरांना आवाहन आहे.
चाचणीची सुविधा
आपल्याकडे जास्तीत जास्त चाचणीची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यंत्रणेवरील भार आपण जेवढा कमी करू तेवढी ही यंत्रणा कार्यक्षमतेने काम करेल, सरकारच्या सर्व सूचना पाळा. घरात राहा, वर्क फ्राॅम होम करा, अनावश्यक गर्दी करू नका नाहीतर नाईलाजाने सरकारला कडक उपाययोजना कराव्या लागतील, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.