राज्यात आज 1380 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 64 हजार 153 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 3874 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 58 हजार 054 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 54 हजार नमुन्यांपैकी 1 लाख 28 हजार 205 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 94 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 375 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 160 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. या मृत्यूमध्ये मुंबई 136, जळगाव 10, नाशिक 10, पुणे 11, सोलापूर 1, औरंगाबाद 6 जालना, बीड, लातूर प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 148 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.04% इतकेे आहे. राज्याचा मृत्यू दर 4.67% इतकेे आहे.