Advertisement

मुंबईत अघोषित पाणी कपात! महापालिकेच्या स्थायी समितीत विरोधकांचा राडा

गेल्या महिन्याभरापासून मुंबईत अनेक ठिकाणी महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरू आहे. त्याच्या कित्येक तक्रारी माझ्यासह आमच्या नगरसेवकांकडे आल्या आहेत. पण तरीही पालिका ते मानायला तयार नाही. कुठंही पाणी कपात नाही असं म्हणत पालिका नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे.

मुंबईत अघोषित पाणी कपात! महापालिकेच्या स्थायी समितीत विरोधकांचा राडा
SHARES

यंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एेरणीवर आला आहे. असं असताना मुंबईकरांनाही पाणी कपातीला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप करत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत विरोधी पक्षांनी बुधवारी चांगलाच राडा केला. गेल्या महिन्याभरापासून मुंबईत महापालिका प्रशासनाकडून अघोषित पाणी कपात केली जात आहे. यासंबंधीच्या शेकडो तक्रारी प्रत्येक विभागातून येत असताना महापालिका प्रशासन मात्र पाणी कपात नसल्याचं म्हणत असल्याने आक्रमक विरोधकांनी यावरून सभात्याग केला.


'या' विभागात पाणीकपातीच्या तक्रारी

मुंबईतील भायखळा, कफ परेड, महालक्ष्मी, चर्चगेट या भागांबरोबरच उपनगरात पाणी कमी येत असल्याच्या अनेक तक्रारी घेऊन गेल्या महिन्याभरापासून रहिवासी येत आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणी येत अाहे, असं म्हणत मुंबईत महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरू केल्याचा आरोप स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर पाणी कपातीवरून आणि अघोषित पाणी कपातीवरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं सत्ताधाऱ्यासह महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.


पाणीपुरवठा नियमीत

विरोधकांच्या या अघोषित पाणी कपातीच्या आरोपाला उत्तर देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी मुंबईत कुठंही पाणी कपात नसल्याचं सांगितलं. तर नियमीतप्रमाणे ३३५० एमएलडी पाण्याचा पुरवठा मुंबईला होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पण प्रशासनाच्या या उत्तराने विरोधकांचं समाधान झालं नाही, प्रशासन खोटं बोलत असल्याचं म्हणत विरोधकांनी स्थायी समितीत चांगलाच गोंधळ घातला.


नगरसेवकांकडे तक्रारी

गेल्या महिन्याभरापासून मुंबईत अनेक ठिकाणी महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरू आहे. त्याच्या कित्येक तक्रारी माझ्यासह आमच्या नगरसेवकांकडे आल्या आहेत. पण तरीही पालिका ते मानायला तयार नाही. कुठंही पाणी कपात नाही असं म्हणत पालिका नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे.

तर मुंबईत अघोषित पाणी कपात सुरू असताना, नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना शिवसेना मूग गिळून गप्प आहे, महापालिकेचे पहारेकरी डोळे बंद करून पहारा देत आहेत, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना रवी राजा यांनी धारेवर धरलं आहे.



हेही वाचा-

'पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या'

शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातील पाणी पळवतोय कोण?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा