Advertisement

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत सोमवारपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खुल्या झालेल्या मोफत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला.

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ
SHARES

मुंबईत ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खुल्या झालेल्या मोफत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. त्यात दहिसर कोरोना केंद्रांवर लशींचा कमी साठा असतानाच १८ ते ४४ आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्ती लसीकरणासाठी आल्यानं या केंद्रावर प्रचंड गर्दी जमली होती. लस मिळणे अवघड ठरणार हे लक्षात येताच अनेक जण घरी परतले. मात्र पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती असल्यानं पुढे काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारनं १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सोमवारपासून मोफत लसीकरण सुरू केल्यानं त्यापासून वंचित राहिलेल्या हजारो मुंबईकरांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यात महापालिकेनं लशींचा मर्यादित साठा लक्षात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाच लस देण्याचे जाहीर केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनीही लसीकरण केंद्रांकडे गर्दी केल्याचे दृश्य होते. मुंबईतील सुमारे २५० लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू हाती घेण्यात आले.

त्यापैकी दहिसर चेकनाक्याकडील दहिसर करोना केंद्राकडे सोमवारपासून बरीच गर्दी जमली होती. सकाळच्या सत्रात इथल्या केंद्राकडे सर्व वयोगटातील व्यक्तींची गर्दी जमली होती. महापालिकेने लसीकरण केंद्रांकडे सध्या लशींच्या १००ऐवजी ३०० लसींचा साठा पाठविण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरीही लशींची मागणी आणि पुरवठ्यात बरेच अंतर असल्याने लस घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे.

महापालिकेने सोमवारपासून लसीकरणाचा विस्तार केला असतानाच त्यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता ३ दिवस थेट केंद्रावर येण्याची सुविधा दिली आहे. तर उर्वरित ३ दिवस ऑनलाइन नोंदणी सक्तीची आहे. त्यामुळे दहिसरप्रमाणेच अन्य काही केंद्रांवर मुंबईकरांची गर्दी उसळली होती. दहिसर केंद्राकडे लस घेण्यासाठी जमलेल्या सर्वांना लससाठ्याअभावी लस देणे शक्य नव्हते. त्यामुळे तिथले प्रशासनदेखील हतबल होते.

सर्वांची समजूत काढताना अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले. तोपर्यंत लस घेण्यासाठी आलेल्यांची संख्या वाढत गेली. अखेरीस उपलब्ध लससाठ्याच्या आधारे लसीकरण पूर्ण झाले. या कालावधीत लस मिळणार नसल्याचे लक्षात येताच हळुहळू गर्दी ओसरू लागली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा