दोन दिवसांपूर्वी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पूल कोसळला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेच्या चौकशीत या पुलाच्या देखरेखीत निष्काळजीपणा केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हा पूल पडण्यामागे अनेक कारणं असल्याचं उघडकीस झालं आहे.
पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी २०१६ मध्ये डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्टची नियुक्ती करण्यात आली होती. या कामासाठी कंपनीने २ कोटी रूपयेदेखील घेतले होते. तसंच या कामादरम्यान पूल निर्माण करण्यात आल्याचं वर्षही चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. पुलाची निर्मिती १९९८ मध्ये करण्यात आल्याचं सोपवलेल्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. परंतु या पुलाची निर्मिती १९८४-१९८६ च्या दरम्यान झाली आहे. तसंच नव्याने तयार करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हा पूल सुस्थितीत असल्याचंही म्हटलं होतं.
२०१२-१४ या दोन वर्षांमध्ये हिमालय पुलाची दुरूस्ती करण्यात आली होती. या कामात पुलासाठी वापरण्यात आलेल्या सामानाचं वजन १ हजार ४०० किलोपर्यंत वाढलं. हेदेखील पूल ढासळण्याचं प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. तसंच डागडुजीच्या सहा महिन्यांच्या आत हा पूल ढासळल्यामुळे वापरण्यात आलेल्या सामानाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुलाच्या दुरूस्ती आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही निष्काळजीपणा केल्याची माहिती समोर आली आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इंजिनिअर्सनी सोपवण्यात आलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नसल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा -
हिमालय दुर्घटनेची पोलिस करणार स्वतंत्र चौकशी
हिमालय पुलाचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचं कार्यालय गायब