Advertisement

ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव - आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं झाली.

ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव - आदित्य ठाकरे
SHARES

ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्यानं या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं झाली. या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

ठाणे खाडीच्या ६५ चौरस किलोमीटरच्या परिसरात १७ चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्यानं या क्षेत्रात इतर नवीन बंधनं येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.

देशात एकूण ४६ रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली आहे. ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल.

रामसर पाणथळ क्षेत्र म्हणजे?

जगातील विविध देशांनी एकत्र येऊन पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी इराणमधील रामसर इथं करार केला होता. त्यामुळे या कराराला रामसर करार असं तर पाणथळ जागांना रामसर पाणथळ क्षेत्र असं संबोधलं गेलं. या कराराअंतर्गत जगातील १६८ देश एकत्र आले असून या देशांतील एकूण २१७७ पाणथळ जागांचे संरक्षण करीत आहेत.

या क्षेत्रांमध्ये भारतातील २७ ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पाणथळ क्षेत्र या रामसर पाणथळ क्षेत्रात समावेश होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये ठाणे खाडीचा क्षेत्राचाही समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.



हेही वाचा

ठाण्यात कोविड-१९साठी प्रतिजन, RTPCR चाचण्या वाढणार

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग २ महिन्यांत खुला होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा