टोल दारात सवलत, देशभरात डिझेलचे समान दर, बस आणि ट्रकला राष्ट्रीय परवाना या मागण्यांसाठी मालवाहतूकदारांनी पुकारलेलं आंदोलन मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान सरकारकडून जोपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
मागील पाच दिवसांपासून मुंबई आणि ठाणे तसंच रायगड परिसरात जवळपास चार लाख ट्रक उभे आहे. तर देशभरात जवळपास 93 लाख ट्रकचा चक्का जाम आहे. या संपामुळे दररोज 10 हजार कोटीचं नुकसान वाहतूक उद्योगाला सोसावं लागत आहे. तर आतापर्यंत 40 हाजार कोटींचं नुकसान झाल्याची माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी दिली.
वाढलेलं डिझेलचं दर, भरमसाठ टोल यामुळे मोटर चालकाच्या खिशात अतिशय तुटपुंजी रक्कम शिल्लक राहते. अशा अवस्थेत गाडी चालवणे अतिशय कठीण आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही सरकारसोबत याबाबतीत विचारणा करत आहोत मात्र सरकारकडून कुठलीही समाधानकारक प्रतिक्रिया मिळाली नाही. अजूनही जर आमच्या मागण्यांवर विचार केला गेला नाही तर हा संप अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा वाहतूकदारांच्या संघटनेकडून देण्यात आला आहे.
शुक्रवारी 20 जुलै पासून सुरू असलेल्या या संपात पहिल्या दिवशी स्कुल बस आणि पाणी टँकर वाहतुकदारांनी समर्थन दिलं होते. मात्र सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीला या संपातून वगळण्यात आलं होतं. पण आता हे वाहतूकदारसुद्धा समर्थन देण्याच्या तयारीत असल्याचं गुड्स अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा -