बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानातील तुळशी तलावाशेजारी एका वन रक्षकाचा मृतदेह गुरूवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. स्वस्तिक काटकर (३०) असं या मृत वन रक्षकाचं नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात स्वस्तिकचा मृत्यू झाल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र स्वस्तिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानात सुरक्षेच्या दृष्टीने एसजीएनपीचे वन रक्षक सर्वत्र तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार गुरूवारी रात्री तुळशी तलावाजवळ वन रक्षक स्वस्तिकची ड्युटी होती. स्वस्तिक मूळचा यवतमाळच्या पूसद येथील रहिवासी आहे. गुरूवारी स्वस्तिक व त्याचे सहकारी वन रक्षक साठे, साळवी आणि इतर मित्रांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीनंतर हे सर्वजण तलावात उतरले. स्वस्तिकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
स्वस्तिकच्या सहकाऱ्यांनी त्याचा रात्रभर शोध घेण्याता प्रयत्न केला. मात्र स्वस्तिक सापडला नाही. अखेर गुरूवारी सकाळी स्वस्तिकचा मृतदेह पाण्यात तरंगू लागल्यानंतर सर्वांचं लक्ष त्याच्यावर पडलं. सुरूवातीला स्वस्तिकचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याचा स्थानिकांना संशय आला.
त्यानंतर स्वस्तिकचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आला. शवविच्छेदन अहवालात स्वस्तिकचा मृतदेह पाण्यात बुडून झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.
हेही वाचा-
बिबट्याच्या हल्ल्यात वन रक्षकाचा मृत्यू
हल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार