दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागांत खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होतं. या खड्ड्यांमुळं नागरिकांच्या जीवाला धोका असून प्रवासादरम्यान अपघाताची चिंता या प्रवाशांना सतावत असते. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिका खड्डे बुजवण्याच्या कमाला सुरूवात करते. मात्र खड्ड्यांच्या प्रश्न काही सुटत नाही. दरवर्षी प्रमाणं यंदाही मुंबईत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील रस्त्यांबाबत कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई तसेच आयुक्तांना दर आठवड्याला आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं लांबच लांब वाहतूक कोंडी होत असून अपघातही घडत आहेत. मुंबईतील खड्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'एप्रिलपासून आजपर्यंत ४२ हजारांच्यावर आपण खड्डे भरले आहेत. दरम्यान, भरलेले खड्डे पुन्हा उखरले की नवीन खड्डे निर्माण झाले ही पाहणी २ दिवसांपुर्वी केली. तसंच खड्डे भरताना अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांवर, कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवलं पाहीजे. हे करत असताना वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहीजे', असं त्यांनी म्हटलं.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि त्याच्या आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. कोंडी होण्याचे सर्वात मोठे कारण खड्ड्यांना सांगितले जात आहे. खड्ड्यांमुळे लोक खूप चिंतेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेते खड्डे भरण्याचे काम झाले पाहीजे, असे किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.