पाकिस्तानच्या तुरूंगातून सुटून मंगळवारी वाघा बाॅर्डरद्वारे भारतात दाखल झालेला हमीद अन्सारी आज मुंबईतल्या वर्सोव्यातील आपल्या घरी परतू शकतो. ३३ वर्षांच्या हमीदने वाघा-अटारी बाॅर्डर ओलांडून भारतीय जमिनीवर पाय ठेवताच त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. मायदेशाच्या पवित्र जमिनीवर नतमस्तक होऊन कुटुंबीयांना मिठी मारून त्याने आपला आनंद व्यक्त केला.
हमीद आपल्या कुटुंबासोबत वर्सांवा मेट्रो स्टेशनजवळ राहायचा. पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटून हमीदला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्याच्या आई वडिलांना आपलं वडिलोपार्जीत घर विकून दिल्लीला तळ ठोकून राहावं लागलं.
हमीद आणि त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी सकाळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. तिथून पुढे ते मुंबईकडे निघण्याची शक्यता आहे.
मुंबईत राहणाऱ्या हमीदची एका पाकिस्तानी तरूणीसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याने हमीद या तरुणीला भेटण्यासाठी २०१२ मध्ये पाकिस्तानात गेल होता. परंतु पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि कोहाट येथील स्थानिक पोलिसांनी हामीदला अटक केली.
पाकिस्तानी बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपाखाली १५ डिसेंबर २०१५ मध्ये लष्कराच्या कोर्टानं त्याला ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून हमीद पेशावर तुरूंगात शिक्षा भोगत होता. त्याची शिक्षा १५ डिसेंबर २०१८ ला पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा भारतात परतला आहे.
हेही वाचा-
प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला हमीद ६ वर्षांनी मुंबईत परतणार
उदानी हत्याकांडातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी