Advertisement

रेल्वेमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर रद्द, सीएसएमटीमध्ये म्युझियम नाहीच!

दिल्लीत रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे म्युझियम होणार नसल्याचं आश्वासन रेल्वे कर्मचारी संघटनांना मिळाल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर.पी.भटनागर यांनी दिली.

रेल्वेमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर रद्द, सीएसएमटीमध्ये म्युझियम नाहीच!
SHARES

सीएसएमटीच्या इमारतीचं रूपांतर ट्रान्सपोर्ट म्युझियममध्ये करण्याचा प्रकल्प अखेर बासणात गुंडाळण्यात आला आहे. रेल्वे कर्मचारी संघटनांनी केलेले आंदोलन आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन नरमले असून हा उपक्रम स्थगित करण्यात येत असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. आर.पी.भटनागर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना ही माहिती दिली.


नोव्हेंबर २൦१७ मध्ये रेल्वेमंत्र्यांची घोषणा

रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबई भेटीवर आले असताना सीएसएमटीच्या इमारतीमध्ये हेरिटेज म्युझियम उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. एवढंच नाही, तर या कामाचं टेंडर पास होऊन कामाला सुरूवात करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, मध्य रेल्वेच्या मुख्यालयात काम करणाऱ्या आणि अन्य कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचा निषेध करत आंदोलनाला सुरुवात केली.

दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाला अखेर संघटनांनी आमरण उपोषणावर जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात रेल्वे कर्मचारी संघटनांनी रेल्वे प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावाही केला


दिल्लीत मिळाले आश्वासन

अखेर दिल्लीत रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे म्युझियम होणार नसल्याचं आश्वासन रेल्वे कर्मचारी संघटनांना मिळाल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर.पी.भटनागर यांनी दिली. त्यामुळे इथले कर्मचारी आता खूश झाले आहेत. या इमारतीत बांधण्यात येणाऱ्या रेल्वे म्युझियममुळे मध्य रेल्वेच्या मुख्यालयासह अन्य कार्यालयांनाही दुसरीकडे हलवलं जाणार होतं. पण, आता ती वेळ येणार नाही.


३ महिन्यांचा होता अल्टिमेटम

रेल्वे मंत्रालयाने म्युझियम बनवण्यासाठी तीन महिन्यात हे मुख्यालय खाली करण्याचे आदेश दिले होते. या इमारतीशी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. नवीन मुख्यालय बनवण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च येणार होता. जनतेचा हा पैसा आता वाचणार असल्याचं मत सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. आर.पी.भटनागर यांनी व्यक्त केलं आहे. फक्त शिफ्टिंग करण्याचाच खर्च जवळपास ४१ करोड रुपये होणार होता. ज्याच्यातून काहीच फायदा रेल्वेला होणार नव्हता, असंही भटनागर यांनी सांगितलं आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा